व्यंगचित्राचा ठोसा हा सामाजिक दांभिकतेवर बसतो तेव्हा त्याचे पडसाद कित्येक काळ जनमानसावर शिल्लक राहतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उघडकीस आलेल्या पुनर्मूल्यांकनावेळी गुण वाढवून देण्याच्या प्रकरणावर भाष्य करणारे व्यंगचित्र ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी ‘लोकसत्ता’साठी रेखाटले होते. ते व्यंगचित्र प्रासंगिक असले तरी तेंडुलकरांनी आपल्या कुंचल्यातून शिक्षणाच्या भूत-भविष्याचे सत्यच समोर आणले होते. प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षेतील गैरप्रकार, पीएच.डी.सारखी सर्वोत्तम पदवी देण्यातील घोटाळे, पीएच.डी.च्या प्रबंधांची चालणारी विक्री, वाङ्मय चौर्य करणाऱ्या प्राध्यापकांवर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घालण्यात आलेली बंदी, उद्योगांसाठी सक्षम मनुष्यबळ म्हणून उपयोग नाही असे दरवर्षी लाखोंच्या संख्येने तयार होणारे अभियंते.. अशा राज्यातील विद्यापीठांमध्ये आजही चालणाऱ्या गोंधळावर कोरडे ओढणारे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१२ च्या डिसेंबरमध्ये परीक्षा विभागातील घोटाळा उघड झाला. परीक्षा विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुनर्मूल्यांकन करताना विद्यार्थ्यांचे गुण वाढवले असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचबरोबर निवृत्त पोलीस उपायुक्त शरद अवस्थी यांची सत्यशोधन समिती या प्रकरणी नेमण्यात आली. अवस्थी यांनी पुनर्मूल्यांकन प्रकरणाचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील धागेदोरे समोर आणले. विद्यार्थी आणि गुण वाढवून देणाऱ्या दलालांच्या अटकेपासून सुरू झालेले हे प्रकरण विभागातील सहायक कुलसचिव, उपकुलसचिव यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. त्याचबरोबर परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पूर्वीपासूनच असे प्रकार विद्यापीठात घडत असल्याचे अवस्थी यांनी समोर आणले होते. त्याला पुष्टी मिळेल असे घोटाळे समोरही आले होते. एकप्रकारे विद्यापीठाच्या पदव्यांची विक्रीच सुरू होती. तत्कालिन परिस्थितीवर शब्दातीत भाष्य करणारे व्यंगचित्र तेंडुलकर यांनी ‘लोकसत्ता’साठी रेखाटले होते. राज्यातील शिक्षणाची परिस्थिती मांडणाऱ्या व्यंगचित्रातून तेंडुलकर आजही भेटतात.. असे घडले व्यंगचित्र. अवस्थी समितीने अहवाल दिला. त्यात विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. मात्र, तो अहवाल दडपण्याचे प्रयत्न त्यावेळी विद्यापीठातून सुरू झाले. विद्यापीठाची बदनामी होते, परीक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशा केल्या जातात, त्यामुळे कामावर परिणाम होतो, कर्मचाऱ्यांवर अविश्वास आहे, अशी ओरड विद्यापीठात सुरू झाली. विविध संघटनांच्या आडून चौकशी थांबावी यासाठी दबाव येऊ लागला होता. त्यावेळी अवस्थी यांच्या विनंतीवरून तेंडुलकर यांनी व्यंगचित्र रेखाटले. त्या आठवणीबद्दल अवस्थी सांगतात, ‘मी आणि मंगेश तेंडुलकर जुने मित्र होतो. माझ्यावर दबाव येऊ लागला होता. मात्र विद्यापीठात जे घडत होते, ते समोर येणे आवश्यक होते. या सगळ्या प्रकारावर लेख लिहिण्याची विनंती मी तेंडुलकर यांना केली. लेख नाही पण अनेक लेखांमध्ये मांडता येणार नाही अशी परिस्थिती त्यांनी एका व्यंगचित्रातून समोर आणली..’